

गेवराई ( लातूर) : गजानन चौकटे
पुराची चाहूल लागताच गेवराई तालुक्यातील गोदाकाठावरील 32 गावांना भरते धडकी, आणि प्रशासन मात्र केवळ सतर्कतेचा इशारा देऊन मोकळे होते. पाण्याखाली जाणार्या मंदिराच्या घंटा थांबतात, राजापूर सारखे गाव बाह्यजगतातून तुटतात, पण पुनर्वसनाच्या आश्वासनांना मात्र नेहमीच पाणचट प्रतिसाद मिळतो.
गोदावरी नदीच्या कुशीत वसलेली ही गावं म्हणजे पावसाळ्यातील तासभरची बातमी आणि वर्षभराची उपेक्षा! गेल्या 19 वर्षांपासून पुनर्वसन हा शब्दच केवळ शासकीय फायलींत अस्तित्वात आहे, प्रत्यक्षात गोदाकाठावरील नागरिक अजूनही दरवर्षी पूर आणि असुरक्षिततेची दाढेत अडकतात.
पाथरवाला बुद्रुक येथील शेतकरी भिमा जगताप सांगतात, आमचं आयुष्य म्हणजे गोदावरीच्या लाटांवर नांगरलेली शेती. दरवर्षी घरात पाणी शिरतं, संसार वाहून जातो... आणि सरकारकडून फक्त आश्वासनं मिळतात! राक्षसभुवन येथील पांडुरंग भोसले म्हणाले, पंचाळेश्वरचं मंदिर दरवर्षी पाण्यात जातं... पण आमच्या व्यथा कुणाला कळत नाहीत. पुनर्वसन झालं नाही, तर ही गावं पुरातच गाडली जातील. पुरात अडकलेले हे गाव प्रशासनाच्या विस्मृतीचा बळी ठरत आहेत. सतर्कतेच्या नावाखाली फक्त दवंडी पिटून काम उरकले जाते. पुनर्वसनाचा मुद्दा मात्र ठोस कृती विना गाळातच रुततो. यंदा नागरिकांची आशा ही गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडे लागून राहिलेली आहे.
गोदाकाठच्या नागरिकांसाठी मूलभूत सुविधा, सुरक्षिततेसाठी पूल उंचावणे, तसेच कायमस्वरूपी पुनर्वसन यासाठी आता प्रत्यक्ष कृती होणे अत्यावश्यक आहे. दरम्यान आता पुनर्वसन विषय कडे पाहताना पाणी हे जीवन असलं, तरी दरवर्षी पाण्यात अडकून मरण येणं हे आमचं नशीब नसावं! अशी भावना व्यक्त केली आहे.
गेवराई तालुक्यातील गुळज, पाथरवाला बुद्रुक, राक्षसभुवन, राजापूर, काठोडा, गोपत पिंपळगाव, पांगुळगाव, रामपुरी, पांचाळेश्वर, ढालेगाव, हिंगणगाव अशा 32 गावांची अवस्था पूर येताच दहशतीची होते. राजापूर गावातील कापसी नदीवरील पूल हा अस्थिरतेचे प्रतीक बनलेला असून, याच पुलावरून नागरिकांचे जीव मुठीत धरून प्रवास चालतो. पूल उंचावावा अशी मागणी दरवर्षी केली जाते, पण वर्ष सरते आणि मागणीच ओसरते. असे संतप्त बोल राजापूरच्या नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळाले.