

ईट :खरीप हंगाम तोंडावर आला असताना ईटसह परिसरातील सुमारे 18 ते 20 गावांमध्ये डिझेल टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. शेतशिवारातील मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असतानाच डिझेल अभावी शेतकऱ्यांची मोठी परवड होत असून, रखरखत्या उन्हात डिझेलसाठी भटकंती करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
ईट येथील दोन्ही पेट्रोल पंपांवर दोन ते तीन दिवसांनी डिझेल उपलब्ध होत असल्याने डिझेल येताच शेतकरी, ट्रॅक्टर चालक व वाहनधारकांची मोठी गर्दी होत आहे. डिझेल मिळवण्यासाठी ट्रॅक्टर व इतर वाहने घेऊन शेतकऱ्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेकजण प्लास्टिकचे कॅन घेऊन पंपावर रांगा लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आधीच इंधन दरवाढ, मशागतीचा वाढलेला खर्च आणि मजुरीतील वाढ यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच आता डिझेल टंचाईमुळे शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत.
नांगरणी, कोळपणी, गाळ टाकणे, विहिरींची कामे यासाठी ट्रॅक्टर व यांत्रिक साधनांचा वापर केला जातो. मात्र आवश्यक इंधनच उपलब्ध होत नसल्याने अनेक ठिकाणी मशागतीची कामे अर्धवट अवस्थेत थांबली आहेत. काही ठिकाणी ट्रॅक्टर व इतर यंत्रणा डिझेलच्या प्रतीक्षेत शेतातच उभ्या असल्याचे चित्र आहे. मजुरांची टंचाई असल्याने शेतकरी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करत आहेत. मात्र तंत्रज्ञानासाठी लागणारे इंधनच मिळत नसल्याने ऐन हंगामात शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
मॉन्सूनपूर्व मशागतीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. दरम्यान, इंधन दरवाढीचा परिणाम शेतीमाल वाहतुकीवरही होत असून, ट्रॅक्टर चालकांनी मशागतीच्या दरात प्रतिएकर 200 ते 300 रुपयांची वाढ केली आहे. कडक उन्हामुळे दिवसा काम करणे कठीण होत असल्याने रात्रीच्या मशागतीसाठी अतिरिक्त मजुरीही द्यावी लागत आहे.
ग्रामीण भागात डिझेलची टंचाई तीव्र असताना प्रशासनाकडून मात्र पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावरील अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचेही प्रशासनाचे म्हणणे आहे.