

Special police patrols in sensitive areas in Latur
लातूर, पुढारी वृत्तसेवा रात्री अकरानंतर विनाकारण फिरत असलेले टोळके, टवाळकी करत फिरणारे तरुण, दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेवरून लातूर शहरांमध्ये रात्री अकरा वाजेनंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. शहरातील महत्त्वाच्या व इतर संवेदनशील भागात विशेष गस्त मोहीम हाती घेण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे सूचना व मार्गदर्शनात १३ जुलै रात्री अकरानंतर विनाकारण रस्त्यावर रेंगाळणाऱ्या टवाळखोरांवर कार्यवाही करण्यात आली आहे. त्यांना सूचना घेऊन रस्त्यावरून हाकलून देण्यात आले आहे. यामध्ये शहरातील सर्व पोलिस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी अंमलदार यांच्यामार्फत ही संयुक्त मोहीम यापुढे राबविण्यात येणार आहे.
रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असून, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. या शिवाय चारचाकी वाहनांत रात्री बेकायेदशीर वाहतूक होते का? याचाही तपास सुरू करण्यात येत आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी शांतता असावी विनाकारण फिरणाऱ्यावर नियंत्रण ठेवता यावे. गुन्-हेगारांची धरपकड करून वेळीच गुन्ह्यांना पायबंद घालणे, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी, या उद्देशाने ही कारवाई सुरू करण्यात आली रात्री अकरानंतर रस्त्यावर रेंगळणाऱ्यांची कसून तपासणी करण्यात येणार असून ट्रिपल सीट फिरणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी होत आहे.
लातूर शहरातील ५ नंबर चौकात १३ जुलै रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने दारू पिऊन वाहन चालवण्यावर कार्यवाही केली. सुजुकी बर्गमन मोटारसायकल क्रमांक एम एच २४ सी ए ०९९५ चा चालकाची ब्रेथअनालायझरद्वारे तपासणी केली असता त्याने मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन करून त्याच्या ताब्यातील मोटारसायकल अतिशय वेगात, वेडीवाकडी पद्धतीने चालवीत असताना मिळून आल्याने त्याच्यावर पोलिस ठाणे एमआयडीसी येथे कार्यवाही करण्यात आली.
गैरसोय टाळण्यासाठी आपण निर्धारित वेळेतच आस्थापना चालू व बंद करावे. विनाकारण रात्री उशिरापर्यंत आस्थापना चालू ठेवू नये. पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन लातूर पोलिसांकडून सर्व आस्थापनाधारकांना करण्यात आले आहे.