A series of accidents continues due to the faulty planning of the national highway
चाकूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीच्या नियोजनामुळे लातूर रोड बायपास टी-पॉइंटवर दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच असून याठिकाणी पुन्हा एकदा भीषण अपघात होऊन एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने या धोकादायक ठिकाणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मंगळवारी माजी उपसरपंच पंडित नामदेव पवार (वय ५७) शंकरनगर तांडा वडवळ येथील रहिवासी. ते मोटारसायकलवरून गावाकडे जात असताना लातूर रोड बायपास टी पॉइंटजवळ त्यांच्या मोटारसायकलला उड्डाणपुलावरून येणाऱ्या भरधाव ऑटोने त्यांना जोरदार धडक दिली. त्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
लातूरहून नांदेडकडे गेलेला राष्ट्रीय महामार्ग जेवढा तारक आहे, तो तेवढाच मारक ठरत चालला आहे. या राष्ट्रीय महामार्गांवर दीड ते दोन किलोमिटर अंतराच्या उड्डाणपुलाची निर्मिती केली आहे. लातूर रोडचा उड्डाणंपूल जवळपास दीड किलोमीटरचा उभारण्यात आलेला आहे. तो बायपासपर्यंत टी पॉईंटवर समाप्त केला आहे.
लातूररोडहून घरणीला जाणाऱ्या लोकांना तो अतिशय धोकादायक ठरत आहे. तेथून रस्ता ओलांडताना किंवा डाव्या साईडने लातूरकडे जाण्यासाठी जीव मुठीत धरून जावे लागते. कारण नांदेडहून येणाऱ्या वाहनाचा वेग उड्डाणपुलाच्या उतारामुळे भरधाव असतो. त्याच्या वेगाचा अंदाज येत नसल्यामुळे याठिकाणी धोका निर्माण झाला आहे. याच ठिकाणी लातूर रोडकडून घरणीकडे जाताना सर्व्हिस रोड अथवा त्या उड्डाणपुलाची लांबी वाढविणे गरजेचे होते.
परंतु राष्ट्रीय महामार्गाने अपघात होऊ नये या दृष्टीने कुठलीच नियमावली नागरिकांच्या हितासाठी वापरली नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. यापूर्वी याचठिकाणी घरणीचे उपसरपंच शिवाजी बैनगिरे यांचा रस्ता ओलांडताना दोन गाड्यांच्या मध्ये सापडून अपघात झाला होता. त्यांचे नशीब बलवत्तर असल्यामुळे त्यांचा जीव वाचला त्यांना अपंगत्व आले असून ते एक वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना रस्ता ओलांडून जाणे जिकिरीचे झाले असल्यामुळे त्यांनीही संताप व्यक्त केला आहे. लातूररोड टी-पॉईंटहून गावाकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहन धारकांना महामार्ग ओलांडावा लागतो. मात्र भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे येथे अपघाताचा धोका कायम निर्माण होत असतो. पुरेशा सुरक्षा उपाययोजनांचा अभाव, वेग नियंत्रणासाठी प्रभावी यंत्रणा नसणे आणि उड्डाणपुलाच्या लांबीकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांनी उड्डाणपुलाची मागणी केली आहे.
त्यावर ठोस कार्यवाही झाली पाहिजे. परिणामी या ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच राहणार आहे. नुकत्याच झालेल्या अपघातात पंडित पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एकदा या प्रश्नाची तीव्रता समोर आली असून भविष्यात आणखी जीवितहानी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.