

Yellow alert issued for Jalna district.
जालना, पुढारी वृत्तसेवा : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा (मुंबई) यांनी जालना जिल्ह्यासाठी ३ ते ५ जुलै दरम्यान, यलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ३ व ४ जुलै रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे (ताशी ४० ते ५० किमी वेगाने) आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.. ५ जुलै रोजी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ६ व ७जुलै रोजी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वादळी हवामानात झाडाखाली किंवा विद्युत खांबाजवळ उभे राहू नये, विजांचा कडकडाट सुरू असताना विद्युत उपकरणांचा वापर टाळावा तसेच उघड्या मैदानात किंवा धोकादायक ठिकाणी थांबू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, तहसील कार्यालय किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल
सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या मालाचे संरक्षण करावे तसेच जनावरांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असेही प्रशासनाने सांगितले आहे. वीज, वादळी वारे आणि पावसामुळे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी सतर्क राहून हवामान विभागाच्या पुढील सूचनांचे पालन करावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यत १३९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात ५.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मोठे पाऊस नसल्याने लघु व मध्यम प्रकल्पात अद्यापही समाधान-कारक पाणीसाठा नसल्याने विहिरी व बोअरच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. रिमझिम पावसावर पेरणी केलेली कोवळी पिके तग धरून आहेत.