

Yellow alert again in the district: Possibility of rain with gusty winds, farmers panicked
जालना, पुढारी वृत्तसेवा : मुंबई येथील कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने जालना जिल्ह्यात १४ ते १६ दरम्यान यलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे व हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वारा शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान १२ व १३ सप्टेंबर रोजीही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जालना जिल्ह्यात सततच्या पावसामुळे खरीप पिकावरं विपरीत परिणाम झाल्याने शेतकरी हैराण असतानाच हवामान विभागाने पुन्हा यलो अलर्टचा इशारा जारी केला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मकासह इतर खरीप पिकांना सततच्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. त्यातच पुन्हा यलो अलर्टचा इशारा देण्यात आल्याने शेतकरी धास्तावले आहेत. जालना शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले.
ढगाळ वातावरण व पावसामुळे खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मेघगर्जनेच्या वेळी तसेच वीजा चमकत असताना व वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दर रहावे आदी सूचना प्रशासनाच्यावतीने केल्या आहेत.
जालना जिल्ह्यात ज्या भागात यापूर्वी अतिवृष्टी झाली त्याच भागात पुन्हा जोरदार पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांची अवस्था अति झाले अन रडू आले अशी झाली आहे. जिल्ह्याच्या काही भागात पावसाने शेतकरी हैराण असतानाच काही भागांत गरजे पुरताच पाऊस पडला, त्यामुळे पावसाची विषम परिस्थिती पहावयास मिळत आहे.