

We will crush all the sugarcane before March 31st MLA Dr. Hikmat Udhan
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : "मतदारसंघातील एकही ऊस शिल्लक ठेवायचा नाही, ३१ मार्च २०२६ पर्यंत सगळा ऊस गाळप झाला पाहिजे," असा ठाम निर्धार आमदार डॉ. हिकमत उढाण यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना जनसंपर्क कार्यालय घनसावंगी येथे आमदार हिकमत उढाण यांच्या अध्यक्षतेखाली भव्य ऊस नियोजन मेळावा पार पडला. मतदारसंघातील तब्बल नऊ साखर कारखान्यांचे कृषी अधिकारी, शिव सेना पदाधिकारी आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कारखान्यांनी सुरुवातीपासूनच टोळ्या आणि हार्वेस्टर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार हिकमत उढाण म्हणाले की, ऊस वेळेत कारखान्यात गेल्यास शेतकऱ्यांचा पाणी, मजुरी आणि वीज खर्च मोठ्या प्रमाणात वाचतो, खोडव्याचे नियोजन चांगल्या पद्धतीने करता येते आणि उत्पादनही वाढते. तसेच शेत लवकर मोकळे झाल्याने पुढील वर्षाचे पीक नियोजन नीट करता येते.
"ऊस उशिरा गेला की वजन घटते आणि शेवटी नुकसान शेतकऱ्यांचंच होतं. त्यामुळे वेळेत गाळप करणे हे सगळ्यांचं कर्तव्य आहे," ऊस उत्पादक शेतकरी, शिव सेना समन्वयक आणि कारखान्यांचा घनिष्ठ समन्वय साधत ३१ मार्च २०२६ पूर्वी ऊस गाळप पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले.
या ठोस निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आ उढाण यांच्या नेतृत्त्वाखाली यंदाचा हंगाम वेळेत आणि सुरळीत पूर्ण होणार, असा विश्वास शेतकरी वगनि व्यक्त केला. या मेळाव्यात गंगामाई शुगर, जय महेश शुगर, मुळा सहकारी साखर कारखाना, प्रवरा सहकारी, बळीराजा शुगर, बारामती अॅग्रो, छत्रपती संभाजी शुगर, जोगेश्वरी शुगर, ओमकार ग्रुप रामेश्वर कारखाना आणि ब्लू सफायर फूड प्रोसेसिंग प्रा. लि. या नऊ कारखान्यांचे कृषी अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांशी चालू हंगामातील ऊस गाळपाबाबत सविस्तर संवाद साधला. शेतकऱ्यांच्या समस्या, ऊस वाहतुकीचे नियोजन, तसेच अतिरिक्त ऊस गाळपाच्या अडचणी यावर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व कारखान्यांनी समन्वयाने काम करून ऊसाचा गाळप विनाअडथळा पूर्ण करावा, असे आवाहन आमदार उढाण यांनी यावेळी केले.