

Violent clash at government hospital over land dispute
अंबड, पुढारी वृत्तसेवा : येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील राहुवाडी तांडा येथील जमिनीच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी १५ जणांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुवाडी तांडा येथील संपत लक्ष्मण राठोड आणि संबंधित व्यक्तींमध्ये काही दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी ११ जून २०२६ रोजी गावात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत दोन्ही बाजूंत शाब्दिक चकमक होऊन वादावादी झाली. त्यामुळे संपत राठोड हे तक्रार देण्यासाठी अंबड पोलीस ठाण्यात गेले होते.
त्यानंतर ते शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी गेले असता आरोपी मोहन साहेबराव राठोड, प्रकाश अर्जुन राठोड, युवराज कन्नू राठोड, संतोष कन्नू राठोड, रामेश्वर अर्जुन राठोड, विठ्ठल कन्नू राठोड, किरण युवराज राठोड, करण संतोष राठोड, अर्जुन किसन राठोड, राजकुमार संतोष राठोड, सतीश साहेबराव राठोड, शांतीलाल गोरख राठोड, राहुल गोरख
राठोड, संपत नानू राठोड व पवन संतोष पवार (सर्व राहणार राहुवाडी तांडा ता. अंबड) या आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातच त्यांच्यात बाचाबाची झाली. दरम्यान संपत राठोड यांनी अंबड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून मोहन साहेबराव राठोड, प्रकाश अर्जुन राठोड, युवराज कनु राठोड यांच्यासह एकूण १५ जणांनी त्यांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीला घेरले. या सर्वांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, दगड हातात घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली. तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे पीडित व्यक्तींची सुटका झाली.
पीडित संपत राठोड यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित १५ संशयित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये कायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार तोडकर हे करत आहेत.