

To eradicate malnutrition, the systems must work in coordination: District Collector Mittal
जालना, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी महिला व बालविकास विभागासह आरोग्य, शिक्षण, पंचायत राज, एकात्मिक बालविकास सेवा योजना तसेच स्वयंसेवी संस्थांनी परस्पर समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना पी. एम. मिन्नू, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती कोमल कोरे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गजानन म्हस्के, डॉ. रघुवीर चंदेल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल सोनी, मुख्यमंत्री फेलो साक्षी उगले यांची उपस्थिती होती.
जालना जिल्ह्यातील कुपोषण, माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे, गरोदर, स्तनदा माता व ० ते ५ वयोगटातील मुलांना पौष्टिक आहार देण्यासोबतच त्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास साधण्यासाठी जिल्हा प्रशासन व हेल्थ स्पोकन ट्युटोरियल आणि विल्स ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या जालना मिशन न्युट्रीशन कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित विशेष प्रशिक्षणा दरम्यान त्या बोलत होत्या.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, कुपोषण हा केवळ एका विभागाचा प्रश्न नसून तो सामाजिक प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने भूमिका ओळखून कार्य करणे आवश्यक आहे. गर्भवती व स्तनदा मातांना वेळेवर पोषण आहार, नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण, तसेच पालकांमध्ये जनजागृती करण्यावर भर द्यावा. अंगणवाडी सेविकांनी नियमित वजनमापन, वाढ नोंदवही अद्ययावत ठेवणे, पोषण विषयक मार्गदर्शन देणे व घरभेटींची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
कुपोषणमुक्त जालना जिल्हा हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. प्रशिक्षणात हेल्थ स्पोकन ट्युटोरियल व विल्स ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने कुपोषण, माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे, गरोदर, स्तनदा माता व० ते ५ मुलांना पौष्टिक आहार या विषयावर तज्ञ मार्गदर्शकांचे अॅनिमेटेड व्हिडिओंचा समावेश आहे.
२५० मास्टर टेनर्सची निवड
या प्रशिक्षण दरम्यान १००० कर्मचारी प्रत्येकी १० प्रमाणे गावातील माता बाळाची जोड़ी दत्तक घेवून त्यांना समुपदेशन करतील व त्यांच्यात प्रगति घडवून आणतील. व कार्यक्रमाअंती या १००० कर्मचाऱ्यां मधून २५० मास्टर ट्रेनर्सची जिल्हा स्तरावर निवड केली जाणार आहे. त्यानंतर हे जिल्हा स्तरीय तज्ञ मार्गदर्शक जिल्ह्यातील सर्व मातांना प्रशिक्षणा अनुसार समुपदेशन करणार आहेत.