

The power of the Biological Input Resource Center for natural farming
जालना, पुढारी वृत्तसेवाः नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची अंमलबजावणी राज्यभरात करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यातील सुमारे २७०० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती केली जात असून, या नैसर्गिक शेतीला जिल्हाभरात उभारण्यात येत असलेल्या २६ जैविक निविष्ठा साधन केंद्राचे बळ मिळणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.
जालना जिल्ह्यातील २७०० हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेती खाली आणण्यासाठी जालना जिल्ह्यात ५४ गटांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे मन वळविण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहे. दरम्यान, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची हानी होते. शिवाय पाण्याच्या गुणवत्तेवरही याचा परिणाम जाणवू लागला आहे. येणारा काळा अधिकच कठीण होणार असल्याने पुन्हा पारंपरिक शेतीकडे वळण्यासाठी शासनाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे.
नैसर्गिक शेती ही रासायनिक विरहित पारंपरिक शेती पद्धत आहे. पिके, झाडे आणि पशुधन यांना कार्यात्मक जैवविविधतेसह एकत्रित करते. नैसर्गिक शेतीमुळे आपली जैवविविधता टिकून राहावी, हा या मागचा उद्देश आहे.
त्यासाठी जिल्हाभरातील एकूण आठ क्लस्टरमध्ये २७०० हेक्टर क्षेत्राची विभागणी करण्यात आली आहे. जालना आणि भोकरदन तालुक्यात सर्वाधिक आठ क्लस्टर असून या क्लस्टरमध्ये सुमारे ४०० हेक्टर जमीन नैसर्गिक शेती खाली येणार आहे.