

The 6 km road from Old Padli to the rehabilitated village has been blocked for the last 5 years.
जालना, पुढारी वृत्तसेवा
गेल्या ५ वर्षांपासून जुनी पाडळी ते पुनर्वसित गावाचा ६ किमीचा रस्ता रखडलेला आहे. मागच्या महिन्यात आहे त्या रस्त्याची अवकाळीने दाणादाण उडवली. ये जा करण्यासाठी ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पाडळीच्या ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर मंगळवार दि. १० रोजी ठिय्या आंदोलन करत साहेब, रस्ता द्या, चिखलातून चालताना हातपाय दुःखतात असा आक्रोश केला.
परतूर तालुक्यातल्या जुने पाडळी गाव ते पुनर्वसित गावापर्यंतचा ६किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या ५ वर्षांपासून रखडल आहे. मागच्या महिन्यात अवकाळी पावसामुळे रस्त्यावर चिखल साचला होता. रस्त्यावरुन ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
५ वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी आज जालन्यातील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर पाडळी येथील ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात हात रस्त्यावर पडून दखापत झालेले ग्रामस्थ आणि महिला देखील सहभागी झाल्या होत्या. पाडळी ग्रामस्थांनी यावेळी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. जोपर्यंत गावातील रस्त्याचे काम सुरु करत नाही तोपर्यंत आंदोलक उठणार नाही, असा पवित्रा पाडळी ग्रामस्थांनी घेतला.
पुनर्वसन ते जुने पाडळी गाव हे ६ किमी अंतरावर वसलेले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी या जुन्या गावाजवळ आहेत. जवळपास ५०० ते ६०० एकर जमीन या रस्त्यावर अवलंबून आहे. शेतरस्ता चिखलमय झाला. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तसेच संबंधित पाटबंधारे विभाग जालना यांचे रस्त्याबाबत असहकार दिसून येत आहे.