

पारध ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात गुप्त संदेश पोहोचवण्यासाठी वापरली जाणारी सांकेतिक भाषा आणि ‘बोटांवरील बाराखडी’ ही विशेष कला आज लोप पावत चालली आहे. मात्र या ऐतिहासिक कलेचा वारसा जपण्याचे काम पारध परिसरातील दोन कलावंत करत आहेत.
निंबोळा येथील पांडुरंग किसन शिंदे आणि अनिल देविदास सावंत हे दोघेही शिवकालीन सांकेतिक भाषा व बोटांवरील बाराखडी ही दुर्मिळ कला जतन करण्यासाठी गावोगावी जाऊन प्रात्यक्षिके सादर करत आहेत. विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन ते ही कला लोकांसमोर मांडतात.
शिवाजी महाराजांच्या काळात गुप्तचर यंत्रणेतील सैनिक आणि संदेशवाहक हे सांकेतिक भाषा व बोटांवरील बाराखडीच्या माध्यमातून संदेश पोहोचवत असत. या पद्धतीमुळे शत्रूला संदेश समजत नसे आणि स्वराज्याची माहिती सुरक्षित राहायची. त्या काळातील या अद्वितीय कलेचा इतिहास आजही अनेकांना माहिती नाही.
या पार्श्वभूमीवर पांडुरंग शिंदे आणि अनिल सावंत हे दोघेही इतिहासाशी निगडित ही कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. “शिवकालीन सांकेतिक भाषा व बोटांवरील बाराखडी ही केवळ कला नसून स्वराज्याच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तरुण पिढीला या इतिहासाची ओळख व्हावी म्हणून आम्ही गावोगावी जाऊन प्रात्यक्षिके देत आहोत,” असे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सांकेतिक भाषा व बोटांवरील बाराखडी ही आमच्या परंपरेतील एक महत्त्वाची कला आहे. माझे आजोबा आणि माझे वडीलही पूर्वी गावोगावी जाऊन या कलेचे सादरीकरण करत असत. त्यांच्याकडूनच मला ही कला शिकण्याची प्रेरणा मिळाली.
पांडुरंग शिंदे
‘शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्तचर व्यवस्था अत्यंत कुशल होती. संदेश सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी सांकेतिक भाषा आणि बोटांवरील बाराखडीसारख्या पद्धतींचा वापर केला जात असे. ही कला स्वराज्याच्या संरक्षणासाठी महत्त्वाची होती. आज पांडुरंग शिंदे आणि अनिल सावंत यांसारखे कलावंत ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. पुढील पिढीपर्यंत हा ऐतिहासिक वारसा पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे.”
रवींद्र सासमकर, इतिहासकार