

आन्वा ः अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रमजान मास व होळी आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर बाजारात जीवनावश्यक वस्तूंच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे. शेंगदाणे, खाद्यतेल, तूरडाळ यांच्यासह विविध मसाल्यांच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे घरगुती बजेट अक्षरशः कोलमडले आहे. सणासुदीच्या तोंडावर खिशाला चांगलीच झळ बसत असून महागाईने नागरिक हैराण झाले आहेत.
यंदा झालेल्या अति पावसाचा फटका शेती उत्पादनाला बसल्याने अनेक मसाल्यांच्या पदार्थांची आवक घटली आहे. दरम्यान मिरची, हळद, धणे, जिरे, विलायची यांसारख्या मसाल्यांचे दर लक्षणीय वाढले आहेत. विलायचीच्या दरात तर किलोमागे मोठी वाढ झाली असून चहा, गोड पदार्थ आणि सणावारी लागणाऱ्या पदार्थाचा खर्च वाढला आहे.
व्यापाऱ्यांच्या मते उत्पादन घट, वाहतूक खर्च आणि साठवणुकीवरील खर्च वाढल्याने ही दरवाढ झाली आहे. तूरडाळीच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या ताटातून तूरडाळ जवळपास गायब होत असल्याचे चित्र आहे. किलोमागे वाढलेले दर पाहता अनेक कुटुंबांनी तूरडाळीऐवजी पर्यायी डाळींचा वापर सुरू केला आहे.
लग्नसराई सुरू असल्याने पुढील काळात आणखी भाववाढीची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. लग्न समारंभ, सण-उत्सव आणि हॉटेल उद्योगातील वाढती मागणी लक्षात घेता बाजारात दर स्थिर राहण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. किराणा व मसाल्याच्या व्यापाऱ्यांशी संवाद साधला असता, येत्या काही आठवड्यांत दरवाढ कायम राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
लग्नसराईत आणखी भाववाढीची शक्यता
मार्च-एप्रिलमध्ये लग्नसराईचा जोर वाढणार असून मसाले, तेल व डाळींची मागणी अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत दर आणखी वाढू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सणासुदीच्या तोंडावर खिशाला झळ ईद, होळी आणि विवाह समारंभासाठी खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.
विलायची प्रति किलो 4 हजार रुपये विक्री होत आहे. तर खसखस 2 हजार रुपये किलो, लवंग 1 हजार रूपये, मिरे 1 हजार रूपये किलो, दगडफुल 1 हजार 200 रुपये किलो भाव आहे. तूरडाळीचे दर वाढल्याने अनेक घरांमध्ये तूरडाळीऐवजी इतर पर्यायांचा वापर सुरू झाला आहे. काही ठिकाणी तूरडाळ ताटातूनच गायब होत असल्याचे चित्र आहे.
मागील वर्षी झालेल्या अती पावसामुळे मुळे मसाल्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मिरची, धणे, हळद यांचे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी असून, याचा थेट परिणाम दरवाढीवर झाला आहे. तेल, डाळी, मसाले महाग झाल्याने नेमकं स्वस्त काय, असा प्रश्न ग्राहक विचारू लागले आहेत. फक्त काही भाज्यांमध्येच दिलासा आहे.