

भोकरदन ः भोकरदन -जाफराबाद विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतमालाची बाजारपेठेत सुलभ व जलद वाहतूक करता यावी. यासाठी बळीराजा पाणंद रस्ते योजनेंतर्गत दर्जेदार व मजबूत रस्त्यांची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संतोष दानवे यांनी दिली.
भोकरदन येथील तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उपविभागीय अधिकारी बी सर्वनन, तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, भूमी अभिलेख विभाग, वन विभाग तसेच पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांनी योजनेचे सविस्तर सादरीकरण केले.
या योजनेंतर्गत प्रति किलोमीटर 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून पूर्ण यांत्रिकीकरणास मान्यता देण्यात आली आहे. जेसीबी, पोकलेन, रोड रोलर, टँकर यांसारख्या यंत्रसामग्रीच्या वापरामुळे रस्त्यांची कामे जलद व दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणार आहेत. रस्त्यांची मोजणी शासनामार्फत विनामूल्य करण्यात येणार असून आवश्यक गौण खनिज व मुरूम रॉयल्टीमुक्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आमदार दानवे यांनी यावेळी सांगितले की, योजनेची अंमलबजावणी पारदर्शकपणे करण्यात यावी व दर्जाबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. संबंधित कामे गुणवत्तापूर्ण पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या बांधापासून मुख्य बाजारपेठेपर्यंत मजबूत रस्ते उपलब्ध होऊन शेतमाल वाहतूक अधिक सुलभ व गतिमान होणार आहे. परिणामी वाहतूक खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लागणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार राहणार समिती अध्यक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या ध्येयपूर्तीसाठी राज्य शासनाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. शेतकऱ्यांच्या हिताची ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणली. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर समित्यांची रचना करण्यात येणार असून तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष संबंधित मतदारसंघाचे आमदार असतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.