

जालना ः बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील दोन जिल्हा परिषद शाळांमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सुमारे 47 हजार 500 रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य आणि शालेय वस्तू लंपास केल्या आहेत. सोमवारी (दि. 11) शाळा सुटल्यानंतर ते मंगळवारी सकाळी शाळा उघडण्यापूर्वीच्या दरम्यान हा प्रकार घडला असून, यामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सेलगाव येथील पी. एम. श्री जिल्हा परिषद प्रशाला आणि जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या एकाच आवारामध्ये आहेत. सोमवारी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर शिपाई विलास भिसे यांनी सायंकाळी 4 वाजता कुलूप लावून शाळा बंद केली होती. मंगळवारी सकाळी 8:15 वाजता भिसे हे शाळा उघडण्यासाठी गेले असता, त्यांना शाळेच्या ऑफिस आणि स्टाफ रूमचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी तात्काळ प्रभारी मुख्याध्यापक अरविंद किसनराव खरात यांना ही माहिती दिली.
मुख्याध्यापकांनी शाळेत येऊन पाहणी केली असता, दोन्ही शाळांमधून 10 हजार रुपये किमतीचा संगणक संच. 30 हजार रुपये किमतीची सॅमसंग कंपनीची टीव्ही. शाळेची पितळी घंटा, गॅस टाकी आणि विद्यार्थ्यांचे खेळाचे साहित्य. इतकेच नव्हे तर, चोरट्यांनी शालेय पोषण आहारातील खाद्य तेल, सोयाबीन वड्या आणि मुगाच्या डाळीची गोणी चोरून नेली आहे.
याप्रकरणी मुख्याध्यापक अरविंद खरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून बदनापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रणजित ब्रह्मानंद मोरे हे या चोरीचा अधिक तपास करत आहेत.