

Ramdas Kamat visits the people of Jalna on the occasion of Independence Day
जालना, पुढारी वृत्तसेवाः भारताचे वीर जवान देशाचे रक्षण कसे प्राणपणाने करतात याचे अतिशय प्रेरणादायी चित्रवर्णन करत 'आजादी की जंग, फिल्मों के संग' या दृकश्राव्य कार्यक्रमाने जालनेकरांना नवी स्फूर्ती दिली.
मुंबई येथील प्रख्यात वक्ते, लेखक व नाट्यदिग्दर्शक रामदास कामत यांनी १४ ऑगस्ट रोजी जेईएस महाविद्यालयात हा कार्यक्रम सादर केला. भारताने शत्रूसोबत लढलेल्या घनघोर युद्धांचा ज्वलंत इतिहास कामत यांनी ओघवत्या वक्तृत्वातून आणि विविध चित्रपटांच्या दृश्यांमधून जिवंत केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, तसेच रंगकर्मी मिलिंद दुसे, सतीश लिंगडे, विनोद जैतमहाल, प्रा. बी. जी. श्रीरामे, प्रा. डॉ. यशवंत सोनुने आर्दीच्या प्रमुख उपस्थितीसह एनसीसीचे विद्यार्थी व प्राध्यापक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा आणि आजवर लढल्या गेलेल्या युद्धांचा इतिहास सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणारा हा एक अप्रतिम कार्यक्रम आहे.
आजच्या शालेय, युवा पिढीला, भारत चीन, भारत पाक युद्धात आपल्या शूर जवानांनी गाजवलेल्या अभूतपूर्व शौर्याचा परिचय व्हावा हाच यामागे उद्देश आहे, असे रामदास कामत यांनी या वेळी सांगितले. सेलिब्रिटी, हिरो या शब्दाचा नेमका अर्थ जाणून, खरे सेलिब्रिटी, हिरो कोण आहेत हे युवापिढीला कळले पाहिजे. कारण आपल्या जवानांच्या शौर्याची माहिती देणारे धडे शालेय पाठ्यपुस्तकात नाहीत, म्हणून या शौर्यगाथा तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कामत यांनी 'किस्मत', 'हकीकत' ते 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' पर्यंतच्या युद्धपटांतील निवडक दृश्यांचा या कार्यक्रमात समावेश केला आहे.
अंगावर शहारे, डोळ्यांत पाणी
भारत-पाक यांच्यातील१ १९४७, १९६५, १९७१ आणि १९९९ तर भारत व चीन याच्यातील १९६२च्या युद्धांचा इतिहास सांगत आणि शहीद, हिंदुस्तान की कसम, बॉर्डर, गाझी अटॅक, एलओसी कारगिल या युद्धपटांतील दृश्ये दाखवत रामदास कामत यांनी प्रेक्षकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत चेतवली. त्यांच्या तेजस्वी शब्दांनी प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येत होते, युद्धाची दृश्ये पाहून रक्त सळसळत होते आणि जवानांचे बलिदान पाहून अभिमानाने क्षणोक्षणी डोळ्यांत पाणी दाटत होते.
सर्व निधी सैनिकांच्या कल्याणासाठी
रामदास कामत जालन्यातील कार्यक्रमाचे मानधन आणि जमा झालेली रक्कमही ते सैनिक कल्याण निधीला देणार आहेत. १४ प्रयोगांमधून मिळालेले सुमारे ८ लाख रुपये त्यांनी आर्मी वेल्फेअर फंडात जमा केले असून त्याबद्दल त्यांना देशाच्या संरक्षण विभागाकडून प्रशंसापत्रही मिळालेले आहे. त्यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे