

भोकरदन/आन्वा ः भोकरदन तालुक्यातील राजूर येथे शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात शेकडो नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागले. तसेच यावेळी शेकडो लाभार्थ्यांना जागेवरच थेट लाभ मिळाला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सविता चौधर व तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांनी पाणंद रस्त्यांची कामे अडवल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील दिला आहे.
याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणाल्या की, शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध महसूल सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. तसेच भोकरदनचे तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे म्हणाले की, तालुक्यातील महसूल यंत्रणा अधिक गतिमान करण्यासाठी तसेच प्रलंबित अर्जाचा त्वरित निकाल लावण्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी तसेच विविध दाखल्यांचे वितरण जागीच करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या शिबिराला पंचायत समिती सदस्यांसह विविध लोकप्रतिनिधींनी विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते काही प्रातिनिधिक लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सातबारा, आठ-अ आणि फेरफार संबंधित अनेक प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी डी. आर. जारवाल, ज्ञानेश्वर दिवटे, महेंद साबळे, योगेश भटकर, अंजली कुलकर्णी, देवानंद नाईक, प्रणव वाघमारे, सुधाकर सुसर, महेंद्र जाधव, आर.पी. कांबळे , सरपंच भाऊसाहेब भुजंग यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयामुळे हे शिबीर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
भूसंपादनावर चर्चा
महाराजस्व शिबिरात अनेक प्रलंबित प्रश्न काढले निकाली अभियानांतर्गत प्रलंबित फेरफार निकाली काढले. तसेच 7/12 दुरुस्तीसाठी संदर्भात काही अर्ज स्वीकारले. त्याचबरोबर या व्यतिरिक्त 251 विविध प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात भूसंपादन प्रकरणावर चर्चा करीत निकाली काढण्यात आली.