

Proposal of Rs 421 crore submitted for heavy rainfall subsidy
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध व्हावे याकरिता शासनाकडे ४२१ कोटी ४१ लाख ४७ हजार २२५ रुपयांचा प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.
जालना जिल्हात सप्टेंबर महिन्यात आठही तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यात सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, ज्वारी, तुर, उडीद, मूग, भुईमूग, भाजीपाला, मिरची, भुईमूग, कांदा, ऊस, हळद, टोमॅटो, टरबूज, सोयाबीन, यासह अन्य फळबागांचा समावेश होता. अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिन्नु, अपर जिल्हाधिकारी श्रीमती रिता मेत्रेवार, निवासी उप जिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उप जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषद यंत्रणा, तहसीलदार, जिल्हा कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणेने युद्धपातळीवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले.
अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर लगेचच वाटप करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. जिल्हयात ४ लाख ४९ हजार २८२ हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. यात जिरायती क्षेत्र ४ लाख २० हजार ५४९, बागायती क्षेत्र १ हजार २७५ हेक्टर, फळपिके २७ हजार ४५८ हेक्टरचा समावेश आहे.
शासन निर्णयानुसार जिरायती क्षेत्रासाठी ८ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर, बागायती क्षेत्रासाठी १७ हजार रुपये प्रति हेक्टर, फळपिकांसाठी २२ हजार ५०० प्रति हेक्टर याप्रमाणे निधीची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या ६ लाख ३ हजार ३९३ एवढी असून यात जालना ८६, ४३३, बदनापूर ६४, ९३३, भोकरदन १०८४७१, जाफराबाद ३३, २६९, परतूर ५०, ५१८, मंठा ५८, ४०८, अंबड १०५७९१, घनसावंगी ९५, ५७० एवढ्या शेतकऱ्यांचा समावेश आहे.