

पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील मंगळवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात यंदा लाल मिरचीने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मिरचीच्या दरात तब्बल 20 ते 30 रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे.
यावर्षी अवकाळी पाऊस व वाढत्या उष्णतेमुळे मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बाजारात मिरचीची आवक निम्म्यावर आली आहे. मागणी तेवढीच असून पुरवठा कमी झाल्याने दर वाढले आहेत. मागील आठवड्यात 200 ते 210 रुपये किलोने विकणारी चांगल्या प्रतीची लाल मिरची 230 रुपये किलो दराने विकली गेली.
घाऊक बाजारातही 250 रुपये किलोपर्यंत भाव गेला आहे.“मिरचीचे भाव वाढल्याने लोणचे, मसाले बनवणाऱ्या महिलांची पंचाईत झाली आहे. हॉटेल व्यावसायिकांनीही तिखटाचे प्रमाण कमी केले आहे.
दरम्यान, शेतकरी सुखावले असले तरी उत्पादनच कमी असल्याने फारसा फायदा होत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहे. नवीन मिरची बाजारात येईपर्यंत दर चढेच राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे पुढील महिनाभर तरी ग्राहकांना ‘लाल मिरचीचा ठसका’ सहन करावाच लागेल. वर्षभर पुरेल एवढा मसला तयार करण्यात येत आहे.
वर्षभराचा मसाला बनविण्याची लगबग
उन्हाळा सुरू झाला की आठवडी बाजार आणि बाजार समितीमध्ये वाळलेल्या लाल मिरचीचा झणझणीत ठसका दरवळू लागतो. वर्षभराचा मसाला (तिखट) बनवण्यासाठी गृहिणींची या काळात लगबग सुरू असते. ग्रामीण भागात एप्रिलनंतर घरातील मसाला-हळद, कांदा-लसूण-खोबऱ्याच्या साठवणुकीची लगबग सुरू होते. सध्या महिलावर्ग मसाला, हळद बनवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, यंदा अवकाळी पावसाने लाल मिरचीची आवक घटली असल्याने भाव वाढले आहेत.
ग्रामीण भागात वर्षाकाठी सरासरी 8 ते 12 किलो मसाला बनवला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला मोठ्या प्रमाणात सुकलेली लाल मिरची खरेदी करतात. सुकलेल्या लाल मिर्चीचा भाव वाढल्याने ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
अर्चना गाडेकर, गृहिणी