

Piles of garbage everywhere, a terrible stench; a serious health crisis looms!
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील विठ्ठल मंदिर, गरिबशहा बाजार, सुंदरनगर, मिल्लत नगर आदींसह परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. परिसरातील रस्ते, मोकळ्या जागा तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांसह संबंधित कर्मचाऱ्यांकडे कचरा उचलण्याची मागणी केली. मात्र, वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
विठ्ठल मंदिर परिसरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे डास, माश्यांचे प्रमाण वाढले असून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि भाविकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, महापालिका आयुक्तांनी या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, कचरा त्वरित हटवून नियमित स्वच्छता करावी. सांडपाण्याचा निचरा नीट होण्यासाठी बळकट व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
अमृत वनाला अवकळा
जालना शहरातील मोतीतलावा जवळ अमृत वन आहे. याच ठिकाणी महापालिकेचे कचरा संकलन केंद्र देखील आहे. अमृत वनाच्या दारातच कचरा टाकल्या जात असल्याने अमृत वनाला अवकळा आली आहे.