

Petrol Shortage: In Jalna, Fuel Limited to ₹200 for Two-wheelers and ₹2,000 for Four-wheelers
जालना, पुढारी वृत्तसेवा :
जालना शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या पेट्रोल टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी पेट्रोल पंपचालकांना इंधन वितरणावर मर्यादा घालण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी एक पत्र काढून पेट्रोलपंप चालकांना दुचाकी वाहनासाठी जास्तीत जास्त २००, तर तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी २००० रुपयांपर्यंतच पेट्रोल देण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे नियामांचे उल्लंघन करणाऱ्या पंपचालकांवर कारवाई करण्याचा थेट इशारा दिला आहे.
इराण-अमेरिका-इस्त्राईल युद्धामुळे पेट्रोल व गॅससंदर्भात वेगवेगळ्या अफवांना पेव फुटले आहे. जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही समाज माध्यमावर पसरविण्यात आलेल्या अफवांमुळे पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांची गर्दी होत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर मनो स्टॉकफचे फलक झळकत आहेत.
त्यामुळे जिथे इंधन उपलब्ध आहे, तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. सदरील परिथिती लक्षात घेऊन सर्व नागरिकांपर्यंत इंधन पोहोचावे यासाठी जिल्हाधिकारी मित्तल यांनी सर्व पंपचालकांना गरजेपुरता म्हणजेच दुचाकीसाठी २००, तर तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी २००० रुपयांपर्यंतच इंधन देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
या निर्णयामुळे काही प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असला तरी वाहनचालकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले असून, यामुळे अधिकाधिक लोकांना इंधन मिळेल, असे मत व्यक्त केले आहे. तर काही वाहनधारकांनी ही मर्यादा अपुरी असल्याची भावना व्यक्त केली आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई
जिल्हाधिकारी मित्तल यांनी एक पत्र काढून आवश्यकतेनुसारच इंधन द्यावे. कॅन, बाटल्या, ड्रम यात इंधन देऊ नये. रुग्णवाहिका व इतर आत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना प्राध्यान्य द्यावे. पंचचालकांनी त्या दिवशी शिल्लक असलेला इंधन साठा, प्राप्त झालेला साठा व मागणी केलेला साठी याची माहिती दर्शनीय भागात फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. तसेच जे आदेशाचे पालन करणार नाहीत, त्या पंपचालकांवर जीवनावश्यक वस्तू अधिकनियम १९५५ कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.