

जालना: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल व डिझेलचा पुरवठा कमी झाल्याने अनेक पेट्रोलपंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी इंधन संपल्याचे फलक लावण्यात आले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जालना जिल्ह्यात जवळपास चाळीस पेट्रोलपंप असले तरी ते बंद चालूच्या फेऱ्यात आहेत. इंधन टंचाईचा परिणामा बाजारपेठ व हॉटेल व्यवसायावरही दिसून येत आहे. वाहतूक खर्चात वाढ झाल्याने भाजीपाला, किराणा तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढू लागले आहेत.
विशेषतः हॉटेल, खानावळ , स्विगी व झोमॅटोसह टिफिन व्यवसायिकांनी वाढत्या खर्चाचा हवाला देत सर्वीसच्या दरात वाढ केली आहे. अनेक खानावळींमध्ये थाळी, नाश्ता व पार्सलच्या किमतीत 10 ते 20 रुपयांनी वाढ करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
वाहतूकदारांनाही डिझेलअभावी मालपुरवठा वेळेत करता येत नसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या प्रवाशांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. डिझेल टंचाईमुळे अनेक ट्रक शहरात डिझेलच्या शोधार्थ एका जागेवर उभे होते.
नो स्टॉकचे बोर्ड
शहरात रविवारी व सोमवारी अनेक पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड झळकले.यामुळे मंगळवारी ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल आले तेथे मोठ्या रांगा दिसून आल्या.दुचाकी व चारचाकीसाठी पेट्रोल भरताना कोणतेही निर्बंध दिसून आले नाही. पेट्रोलपेक्षा डिझेलची टंचाई अधिक असल्याचे दिसून आले.