

Nine people to begin an indefinite hunger strike today
जालना, पुढारी वृत्तसेवा: दिवाणी न्यायालय, जालना यांनी दिलेल्या निर्णयातील मनाई हुकूमाचा अवमान झाल्याचा आरोप करत याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यावर यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी कडवंची येथील नऊ नागरिकांनी केली आहे. या मागणीसाठी गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपविभागीय अधिकारी कार्यालय, जालना यांच्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
यासंदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. यात कडवंची येथील सर्व्हे नं. ५, गट नं. १६ मधील गायरान जमिनीच्या ताब्याच्या संदर्भात दिवाणी न्यायालय, जालना यांनी आदेश दिलेला आहे. या न्यायालयीन आदेशानुसार संबंधित जमिनीच्या ताब्यामध्ये अडथळा निर्माण करू नये, असे स्पष्ट निर्देश असल्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे.
डिक्रीनुसार सदरील गायरान जमीन उपोषणकर्त्यांच्या नावे नियमानुकूल करून देण्यात यावी, अशी प्रमुख मागणीही करण्यात आली आहे. या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आमरण उपोषणात संजय साहेबराव सरोदे, समाधान धोंडिराम साळवे, चत्रभुज शिवाजी साळवे, निवृत्ती रामभाऊ वाहूळ, अंबादास येडूबा साळवे, अण्णा दाजीबा साळवे, नारायण रंगनाथ वाहूळ, कैलास रंगनाथ साळवे आणि श्रावण बापूराव जाधव आदींच्या सह्या आहेत.