

जामखेड :अंबड तालुक्यातील जामखेड परिसरातील ठाकूरवाडी फाटा येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वीच दुचाकी अपघात झाला. दुचाकीवरील दोणे गंभीर जखमी झाले. या खड्ड्यामुळे वारंवार अपघात होत आहे. खड्डा बुजविण्यात यावा, अशी मागणी वाहनधारकातून होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या पंधरा दिवसांपासून या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून, याच ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने अद्याप कोणतीही कायमस्वरूपी दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भरधाव वाहतूक असलेल्या या महामार्गावर अचानक समोर येणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहनांवरील नियंत्रण सुटत असून, विशेषतः सायंकाळी व रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढत आहे. परिणामी हा महामार्ग वाहनचालकांसाठी अक्षरशः “मृत्यूचा सापळा” बनल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
“एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल परिसरातील ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात असून, राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने तातडीने दखल घेऊन धोकादायक खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
“ठाकूरवाडी फाट्यावर महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून वारंवार अपघात होत असून पुन्हा गंभीर अपघात घडला. प्रशासनाने तत्काळ दुरुस्ती करावी.”
अभिषेक पांढरे, नागरिक जामखेड