

MP Kale Opposes Jalna-Jalgaon Railway Line
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जळगाव रेल्वे मार्गाला खा. कल्याण काळे हे शेतकऱ्यांना समोर करून रेल्वे मार्गाच्या भूसंपादनात अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.
जालना शहरातील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते. यावेळी जालना जळगाव नियोजित रेल्वे मार्गाला खासदार डॉ. कल्याण काळे यांचा विरोध अनाकलनीय आहे तरी त्यांच्या विरोधाने काहीच फरक पडणार नाही, असे प्रतिपादन माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आ. नारायण कुचे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष अशोक पांगारकर, नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना दानवे म्हणाले की, जालना जळगाव रेल्वे मार्ग ज्या गावातून जात आहे, तेथील काही शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे सांगितले असल्याचे समजले. परंतु हा या परिसरातील विकासाचा सर्वात मोठा प्रकल्प आहे.
भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. निधी उपलब्ध आहे. त्यामुळे विनाकारण या विषयाला वेगळे वळण देऊ नये असे ते म्हणाले. रेल्वे मार्गासाठी जमीन संपादन करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते केन्द्र सरकारच्या वतीने संपादित जमिनीचा मावेजा ताबडतोब देण्यात येतो. केन्द्र सरकारच्या वतीने २ लाख ५२ हजार कोटी रुपयांची रेल्वेसाठी तरतूद करण्यात आली आहे. हा पैसा एका वर्षात खर्च होतोच असे नाही. त्यामुळे निधीची अजिबात कमतरता नसल्याचे दानवे यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत अडचणी दूर होतील
विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हाधिकारी यांची या रेल्वे मार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेसंदर्भात एक विशेष बैठक होणार असून यात सर्व अडचणी दूर होतील असे दानवे यांनी सांगितले.