Jalna News : ५६४ ऊसतोड कुटुंबांचे स्थलांतर थांबले
Migration of 564 sugarcane harvesting families stopped
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी तालुक्यातील ५६४ उसतोड कामगारांचे स्थलांतरावर थांबवण्यात संस्थेला यश आले आहे. उसतोड कामगार आरोग्य व पोषण खात्रीशीर सेवा प्रकल्पांतर्गत ३६ लाभार्थी कुटुंबांना त्यांच्या शाश्वत उपजिविकेसाठी शेळीपालन, कुक्कुटपालन व किराणा दुकान सुरू करण्यासाठी मदत करण्यात आली आहे. यामुळे उसतोड कामगारांचा स्वावलंबनाकडे प्रवास सुरू झाला आहे.
दरम्यान, हंगामी स्थलांतरामुळे उस कामगारांच्या आरोग्य, पोषण आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत होते. या पार्श्वभूमीवर संस्थेने पर्यायी उपजीविकेचे विविध मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. पशुपालन, फळबाग लागवड, बांधकाम, इलेक्ट्रिक कामे, लघुउद्योग अशा कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे कामगारांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या प्रयत्नांमुळे परतूर व घनसावंगी तालुक्यातील तब्बल ५६४ कुटुंबांचे स्थलांतर थांबविण्यात यश आले आहे.
गाव पातळीवरील उसतोड कामगार समित्यांच्या ठरावांद्वारे पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. लाभार्थ्यांशी नियमित संपर्क ठेवून संस्था गृहभेटीद्वारे त्यांच्या प्रगतीचा आढावा घेत आहे. याचबरोबर लमाणवाडी, माहेरजवळा, क्रांतीनगर आणि आसनगाव येथे सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम घेऊन स्थलांतरित कामगारांच्या समस्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. ३६ लाभार्थ्यांना शेळे वाटप करण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक उगले, जिल्हा समन्वयक एकनाथ राऊत, डॉ. आशोक टाकसळकर आदी उपस्थित होते.
सर्वतोपरी मदत
स्थलांतर थांबविण्यासाठी उसतोड कामगारांनी विविध कौशल्ये आत्मसात करून शासनाच्या योजनांचा लाभघ्यावा. संस्थेची सर्वतोपरी मदत मिळेल. भाऊसाहेब गुंजाळ, जिल्हा लाईन समन्वयक

