

भोकरदन ः शासनाने मनरेगा योजनेत 20 कामांची बंधने घातल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहे. त्यामुळं तत्काळ ही अट रद्द करावी अशी मागणी बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांनी रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्याकडे केली.
छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेऊन संबंधित मागण्यांबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले की ग्रामीण रोजगाराची जीवनदायी योजना म्हणून ओळखली जाणारी मनरेगा सध्या गंभीर प्रशासकीय गोंधळात सापडली आहे. गावात हजारो मजूर असताना फक्त 20 च कामे सुरू करता येतात अशी यंत्रणेत मर्यादा आणल्यामुळे लाखो ग्रामीण रोजगाराचा हक्क मिळण्यात अडथळा निर्माण झाला आहे.
प्रणालीच्या नव्या तांत्रिक बंधनामुळे कोणत्याही गावात 20 पेक्षा जास्त कामांचे मस्टर जनरेट होत नाही. शासनाने व्यक्तिगत लाभाच्या कामांवर अप्रत्यक्षरीत्या 20 कामांच्या मर्यादेची बंदी घालून शेतकऱ्यांना मोठ्या संकटात ढकलल्याचा आरोप शेतकऱ्यामंधून होत आहे.यामध्ये सिंचन विहीर, गायगोठा लाभार्थी अडचणीत सापडले आहे.
मागेल त्याला काम घेण्यासाठी लाभार्थ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, तांत्रिक बंधने आणि जाणूनबुजून लावलेली विलंब पद्धती यामुळे मनरेगा योजनेचा मूलभूत उद्देशच धोक्यात आला आहे.तसेच कुशल व अकुशल रक्कम तत्काळ वितरित करण्यासाठी मुबलक निधी द्यावा.रोजगार सेवकांच्या संपावर तत्काळ तोडगा काढून लाभार्थ्यांची रखडलेली कामे मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.