

पांगरी ः मंठा तालुक्यातील वाई, पांगरी गोसावी शिवारात सध्या ज्वारी, गहू, हरभरा पीक काढणी सुरू झाली असून यावर्षी लवकरच उन्हाचा तडाखा वाढल्याने शेतकरी, मजूर सकाळी सहा वाजता शेतात जाऊन काम करतानाचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
सध्या हरभरा, ज्वारी, गहू काढणी साठी तीन शे रुपये प्रति रोज महिलांना मिळत आहे. तर गुत्त प्रती एकर तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रमाणे काढणीसाठी मोजावे लागत आहेत. सध्या काही शेतकर्यांचा मशीन द्वारे गहू, हरभरा काढणीचा कल दिसत आहे. सध्या सुगीचे दिवस असल्याने सकाळीच गावात सामसूम वातावरण दिसत आहे.
सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत शेतात महिला काम करत असून उन्हाच्या काहिलीमुळे दुपारी विसाव्यासाठी घरी येताना दिसतात. उन्हाचा आणि सुगीचा सीझन एकदाच येत असल्याने सकाळी लवकरच कामाची लगबग सुरू असते.
वाई शिवारात कायमस्वरूपी पाण्याची योजना नसल्याने या शिवारात कोणाकडेच बागायती शेती नाही. त्यामुळे हरभरा, ज्वारी, गहू असी हंगामी पिके घेतली जातात. मोठी बाजारपेठ जवळ नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय, भाजी पाल्याचे उत्पादन घेता येत नाही. हंगामी पीकावरच शेतकरी यांचा अर्थसंकल्प अवलंबून असतो.