

मंठा : तालुक्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, बळीराजाला वाचवण्यासाठी तालुक्यात तत्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि हेक्टरी १ लाख रुपयांचे नुकसान भरपाई अनुदान थेट बँक खात्यात जमा करावे, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने मंठा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. प्रशासनाने १५ ते २१ दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही न केल्यास ‘मनसे स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
निवेदनात म्हटले की, मंठा तालुक्यामध्ये पावसाअभावी आणि कडक उन्हामुळे खरीप हंगामातील पिके पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे तालुक्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत व हलाखीच्या संकटात सापडला आहे. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांना तात्काळ भक्कम आधार देणे गरजेचे आहे.
तालुक्यातील बळीराजाला तात्काळ न्याय द्यावा. जर दिलेल्या मुदतीत कायदेशीर व सकारात्मक कार्यवाही झाली नाही, तर मनसेच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल. त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाला गांभीयाने घेण्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर मनसे तालुकाध्यक्ष गणेश बोराडे, केशव शिंदे, सुशील घायाळ, राम ढेंगळे, पप्पू घनवट, बाळासाहेब बोराडे, डॉ. प्रल्हाद गडदे, भागवत मुर्तडकर, राम डहाळे, रोहित कदम, शिवराज शिंदे, सुदर्शन बोराडे, अर्जुन बोराडे, विकास बोराडे, विजय नवले, सुमित बनवट, दिपक बोराडे, नितीन शेडगे, गणेश मलेडिया, अजय बोराडे, तळेकर चंदू, कचरूलाल बिलोटे, विशाल शिंदे, राहुल मुळे यांच्यासह परिसरातील पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आहेत मागण्या
तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर
शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करा.
हेक्टरी १ लाख रुपये भरपाई
अनुदान थेट बँक खात्यात वर्ग करण्यात यावे.
१५ ते २१ दिवसांत निर्णय घ्यावा