वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मागील तीन दिवसांपासून उपोषणास बसलेल्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना उपचाराकरिता विनंती करण्यासाठी डॉक्टरांचे पथक पुन्हा अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांनी त्यांची आरोग्य तपासणी केली. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची तब्येत खालावली आहे.
सगे सोयरे कायद्याच्या अमंलबजावणीसाठी जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे. त्यांचा बीपी १००/ ६० पर्यंत खाली आला आहे. तसेच शरिरातील साखरेचे प्रमाण ९० पर्यंत घसरले आहे. शुगर लेवल कमी झाल्यामुळे मेंदूतील ग्लुकोजची निर्मिती थांबली आहे. त्यामुळे शरीरातील अनेक अवयवावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते, असे डॉ. वाघमारे यांनी यावेळी सांगितले.
बीपी व शुगर कमी झाल्याने किडनी, हृदय व इतर अवयवावर परिणाम होऊ शकतो. वॉटर लेवलही कमी झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचाराची गरज असून त्यांना उपचार घेण्याची आम्ही विनंती केली. मात्र, ते उपचार घेण्यास नकार देत आहेत, असे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.