वडीगोद्री : हरियाणा आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर एकही जागा येणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला. धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय निकाली निघतो, मग मराठा समाजाचा का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हरियाणातील जाट मतदारांचा संबंध मराठा मतदारांशी लावण्याचे कारण नाही. मराठ्यांनी फासा टाकला की गेलाच, येथे मराठ्यांची मुसंडी वेगळीच असते, आमचेे आरक्षण द्यायचे बघा, असे जरांगे म्हणाले. मराठा समाजाने 106 आमदार दिले होते. एकेका मतदारसंघात 50-55 टक्के मराठा आहेत. सहा नोंदीवर धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा होत असेल, तर आमच्या 57 लाख नोंदींवर आरक्षणाचा मार्ग का मोकळा होत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दसरा मेळाव्याला अद्याप परवानगी मिळाली नसल्याचे ऐकण्यात आले आहे. हा मेळावा होणारच, असे सांगून या मेळाव्यासाठी आपली हेलिकॉप्टरमधून एन्ट्री करण्याच्या समाजाचा निर्णय अमान्य आहे. समाज मोठा झाला पाहिजे, अशीच आपली भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.