

वडीगोद्री : मनोज जरांगे-पाटील यांनी खलील-उर-रहमान सज्जाद नोमानी यांची छत्रपती संभाजीनगर मधील एका हॉटेल मध्ये भेट घेऊन चर्चा केली. सज्जाद नोमानी एक भारतीय इस्लामिक विद्वान आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आहेत. जरांगे-पाटील हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण भेटावे, अशी मागणी करत असताना मुसलमानांनाही आरक्षण भेटले पाहिजे, अशी त्यांची मागणी होती. जरांगे पाटील यांनी जर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी ठेवली आणि सज्जाद नोमानी यांनी मुस्लिम बांधवांना जरांगे यांच्या बाजूने किंवा जरांगे पाटील यांनी उभे केलेल्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले तर राज्यातील विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र दिसू शकते. या भेटीनंतर मराठा-मुस्लिम एकत्र येऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Maharashtra Assembly Election)
या भेटीनंतर माध्यमाशी सवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले की, गोर-गरिबांच्या न्यायासाठी जनतेला एकत्र यावं लागणार आहे. जे वरिष्ठ आहेत जेष्ठ आहेत त्यांना अनेक वर्षांचा अनुभव आहे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, त्यामुळे मी आज सज्जाद नोमानी यांची भेट घेतली. नोमानी हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. त्यामुळे येणाऱ्या निडणुकीत काहीही होऊ शकते, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, सज्जाद नोमानी हे आजारी असल्याने त्यांना आंतरवालीमध्ये येता आले नाही. त्यांना माझी भेट घेण्याची धडपड असूनही त्यांना भेटता येत नसल्याने मी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन त्यांची भेट घेतली. माणुसकीच्या नात्याने आम्ही ही भेट घेतली आहे. (Maharashtra Assembly Election)