वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : पोलीस भरती ईडब्लूएस बाबतचा विषय सध्या सुरू आहे. आम्ही हे आरक्षण रद्द करू नका, असे म्हणालो होतो. एसईबीसी दिले तर ठेवा. पण ईडब्लूएस रद्द करू नका, असे मी म्हणालो होतो. परंतु, आम्ही न मागितलेले एसईबीसी आरक्षण देऊन ईडब्ल्यूएस रद्द करून मराठ्यांच्या मुलांना संपविण्याचा हा सरकारचा घाट आहे, असा आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी आज (दि.३१) केला. ते अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलत होते. याबाबत मंत्री शंभुराज देसाई यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी आम्ही तातडीने लक्ष घालून मुख्यमंत्र्यांना भेटतो, असे सांगितले आहे. (Manoj Jarange)
ते पुढे म्हणाले की, मुलींना मोफत शिक्षण मिळत नाही, हे सत्य आहे. गरिबांच्या मुलींना फसवू नका. अजूनही फी घेतली जात आहे. एसईबीसीमधून अर्ज भरलेल्या मुलांचे देखील वाटोळे करू नका. शिंदे समितीला मुदतवाढ देण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यासमोर आंदोलन सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून १२-१३ संघटना प्रवीण दरेकर यांनी गोळा केल्या आहेत. त्यांना मराठा समाजाचा वापर करून पक्षाला मोठे करायचे आहे, असे जरांगे म्हणाले. (Manoj Jarange)
विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांना मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही. आंदोलकांच्या माध्यमातून सरकारला भांडण लावून द्यायचे आहे. दंगली घडवून आणायच्या आहेत. जाळपोळ करून गाड्या फोडायचा यांचा डाव आहे. भाजपातील ओबीसी या आंदोलकांच्या पाठीशी उभे करणार आहेत. असा सरकारचा नवीन डाव आहे. मराठा आंदोलकांना पुढे करायचे आणि मागे ओबीसीं उभे करून मराठ्यांचे आंदोलन चिघळलं, असे दाखवून मराठा समाजाला बदनाम करायचे आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मराठ्यांची एकजूट फोडण्यासाठी मला बदनाम करण्याचा डाव सुरु आहे. भाजपवाले माझे शत्रू नाहीत आणि हे महाविकास आघाडीवाले पाहुणे नाहीत, असे जरांगे म्हणाले. (Manoj Jarange)