वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत आज (दि.३०) अचानक खालावली. त्यांच्यावर अंतरवाली सराटी येथेच उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांना सलाईन लावले आहे. त्यांना अस्वस्थ वाटत असून रक्तदाब कमी झाला आहे. डॉ. विष्णू संकुडे यांनी उपचार सुरू केले आहेत. रक्तदाब न वाढल्यास पुढील उपचारासाठी छञपती संभाजीनगर येथील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करावे लागणार असल्याचे डॉ. संकुडे यांनी सांगितले.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे आणि सगेसोयऱ्यांचा अध्यादेश तातडीने लागू करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सुरु केलेले उपोषण बुधवारी स्थगित केले. आता उपोषण सोडून समाजामध्ये जाणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले होते. आंतरवाली सराटीतील ग्रामस्थांच्या आग्रहानंतर त्यांनी उपोषण स्थगित करत असल्याचे सांगितले होते.
सलाईन लावून उपोषण करण्यात काही अर्थ नसल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, जरांगे यांनी सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला १३ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.