

Manoj Jarange : Caste certificate canceled due to political bias
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील ४ लोकप्रतिनिधींचे कुणबी जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. सरकारच जात प्रमाणपत्र द्यायला लागले आणि सरकारच रद्द करायला लागले, असे म्हणत राजकीय हेव्या-दाव्यातून सरकारचे लोक जाणून बुजून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून जात प्रमाणपत्र रद्द करत असून, मराठ्यांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
जरांगे पाटील यांनी बुधवारी, (दि.५) माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ५८ लाख कुणबी नोंदी सरकारने शोधल्या आहेत. त्यापैकी काही प्रमाणपत्र सरकारने दिले आहेत. मग सरकारच हे प्रमाणपत्र रद्द करत आहे. हा प्रकार मराठ्यांचा जाणून बुजून छळ करण्याचा आहे. जात प्रमाणपत्र रद्द झालेल्या लोकप्रतिनिधींना उद्या सकाळी ९ वाजता जरांगेंनी अंतरवालीत बोलावले आहे.
जात प्रमाणपत्र रद्द होण्याला सरकार जबाबदार असून, मराठ्यांचे जात प्रमाणपत्र रद्द होतात. मग ओबीसींचे का रद्द होत नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आता सरकारविरोधात मोठी लाट उसळणार आहे. नोंदी असताना प्रमाणपत्र कसे काय रद्द केले, मी आधी या लोकांशी चर्चा करतो, मग कसे असते यांना दाखवतो, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.