

Manoj Jarange Patil Maratha reservation protest : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात वातावरण पुन्हा तापू लागले आहे. १२ सप्टेंबर रोजी सर्व मराठा बांधवांनी हातातील सर्व कामे बाजूला ठेवून तडक अंतरवली सराटीमध्ये उपस्थित राहावे. याच दिवशी मुंबईतील आगामी आंदोलनाची दिशा आणि अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि. ७ सप्टेंबर) माध्यमांशी बोलताना दिली.
"उपोषणाला बसण्याची वेळ पुन्हा येणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करत आहे. शिंदे आणि फडणवीस यांची मिलीभगत असून ते मराठा समाजाची फसवणूक करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
सरकारला १२ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे कोणतेही कारण न सांगता गाव आणि शहरांमधील सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने अंतरवली सराटी गाठावे. विशेषतः नगर, नाशिक, मुंबई आणि ठाण्यातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने एकत्र यावे. अंतरवली सराटीत जमणाऱ्या या बैठकीनंतर मुंबईतील आंदोलनाची रणनीती स्पष्ट केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही. हैदराबाद गॅझेट लागू झाल्यावर दोन महिन्यांनी त्यांचा मला फोन आला होता. फडणवीस यांचं मी फोन घेत नाही, मात्र त्यावेळी त्यांचा फोन आला होता. त्यांच्याबरोबर फोनवरील संभाषणाचे CCTV फुटेज देखील आमच्याकडे आहे, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.