Leaders face challenge to stop rebels
जालना, पुढारी वृत्तसेवा : तब्बल नऊ वर्षान होत असलेल्या जालना महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी कंबर कसून तयारी केली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एबी फॉर्मची वाट पाहिली. मात्र, काही इच्छुकांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराजांची संख्या वाढली. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून सादर केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या नाराजांची नार ाजी दुर करण्याचे मोठे आव्हान पक्षश्रेष्ठीपुढे असणार आहे.
दरम्यान, अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी दि. ३० रोजी काही तास बाकी असताना महायुती फिस्कटली. त्यामुळे भाजपाने ६४ आणि रिपाई आठवले गटाने एका जागेवर आपला उमेदवार उभा केला आहे. तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने देखील सर्वच्या सर्व ६५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
महाविकास आघाडीने आपली मोट बांधली असून, काँग्रेस ४०, राकाँ श.प. पक्ष १२ आणि शिवसेना उबाठा पक्षाने १३ जागा लढवण्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने मनसेशी युती करुन निवडणुक लढवण्याची पूर्ण तयारी केली आहे. आतापर्यंत सुमारे ६५ जागांसाठी जालना शहर महानगरपालिका नामनिर्देशन स्वीकारण्याच्या अंतिम दिवशी दि. ३० रोजी १ ते १६ प्रभागात ९५९ नामनिर्देशनपत्र दाखल झाले.
अर्ज भरण्याच्या दि. २३ ते ३० डिसेंबर या सात दिवसापर्यंत एकूण १२६० नामनिर्देशन प्राप्त झाले आहेत. सर्वच पक्षातील इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरताना पक्षाचा एबी फॉर्म दिला नसल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. येत्या ३ तारखेला उमेदवाराची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. त्यापुर्वी दि. २ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार आहे.
महापौर पदावर सर्वच पक्षांचा दावा
महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले नसले तरी तरी सर्वच पक्षांकडून महापौर पदावर दावा केल्या जात आहे. महायुती फुटल्यानंतर घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने देखील पत्रकार परिषद घेवून आमचाच महापौर होणार असलयाचे जाहीर केले. तर शिवसेना शिंदे गटाने यापूर्वीच महापौर पदाचा उमेदवार जाहीर केला आहे. तर भाजपाच्या बड्या नेत्यांनीही जालन्याचा पहिला महापौर भाजपाचाच होईल, अशी भूमिका घेतली आहे. या महापालिकेच्या रणांगणात कोणाचा विजय होईल, हे येत्या १६ जानेवारी रोजीच समजणार आहे.
राजकीय वातावरण तापले
जालना महापालिकेची निवडणुक चौरंगी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जालना शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, महाविकास आघाडीतील काँग्रेसह इतर घटक पक्ष आपला उमेदवार कसा निवडून आणता येईल, याची रणनिती आखत आहे. तर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीने सोबत न घेतल्याने त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. तर एमआयम पक्ष देखील स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.