

Kharif sowing on 20 percent area in the Jalna district
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ६ लाख ५१ हजार १७४ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी १ लाख ३४ हजार ४६ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली आहे. जवळपास २० टक्के क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने आगामी दोन दिवसांत पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची भीती आहे.
जालना जिल्ह्यात मे महिन्यात जोरदार अवकाळी पाऊस पडत असतानाच हवामान विभागाने यंदा मान्सून वेळेपुर्वी दाखल होण्याचे भाकीत वर्तविल्याने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करुन शेती मशागतीची कामे झटपट उरकली.
जिल्ह्यात खरिपाच्या ६ लाख ५१ हजार १७४ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ३४ हजार ४६ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. जालना तालुक्यात सोयाबीनच्या एकूण ३३ हजार १४२ हेक्टर क्षेत्रापैकी ७ हजार ३७४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कापसाच्या एकूण ४० हजार २५० हेक्टर क्षेत्रापैकी १७ हजार १८९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बदनापुर तालुक्यात सोयाबीनच्या ९ हजार २४२ हेक्टर पैकी ६ हजार १२९, कापसाच्या ४२ हजार ९१८ पैकी ३ हजार ३१, भोकरदन तालुक्यात सोयाबीनच्या २३ हजार ९४६ पैकी १ हजार ६३८, कापसाच्या २२ हजार २५५ पैकी १३ हजार ८०० हेक्टरवर पेरणी झाली आहे.
जाफराबाद सोयाबीनच्या १० हजार २७७ हेक्टर क्षेत्रापैकी १०० तर कापसाच्या ५५ हजार २३५ हेकटर पैकी १३ हजार ८००, अंबड तालुक्यात सोयाबीनच्या २८ हजार ८१४ पैकी ६ हजार २३५, मंठा तालुक्यात सोयाबीनच्या २५ हजार ३६ पैकी ९८५ तर कापसाच्या २२ हजार ७३३ पैकी ९ हजार ८२०, परतूर तालुक्यात सोयाबीन २५ हजार ३६ हेक्टर पैकी ९८५, तर कापसाच्या ३९ हजार २०९ पैकी १ हजार २२८, घनसावंगी तालुक्यात सोयबीनच्या २६ हजार ३९० पैकी ९८९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसामुळे आनंदीत झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र पेरणी झाल्यानंतर गेल्या चार ते पाच दिवस कडक उन्हानंतर बुधवारी वातावरणात बदल झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या.
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळल्यास सोयाबीन बियाणांचा तुटवडा जाणवणार आहे. जिल्ह्यात खतांचा काही वुटवडा जाणवत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पेरणी झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने काही ठिकाणी कोवळे पीक माना टाकू लागले असून काही ठिकाणी कडक उन्हामुळे पेरलेले बियाणे खराब होउ लागले आहे. आगामी दोन दिवसांत पाऊस न पडल्यास १ लाख २३४ हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता आहे.