

Kharif crops have started to wilt due to the scorching heat
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन व जोरदार वाऱ्यामुळे जमिनीतील ओल झपाट्याने कमी होऊन खरिपातील कोवळी पिके कोमेजू लागली आहेत. आगामी तीन ते चार दिवसांत पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची भीती आहे.
जूनच्या अखेरीस व जुलैच्या प्रारंभी पडलेल्या पावसावर घनसावंगी तालुक्यात खरीप हंगामातील बहुतांश पेरण्या पूर्ण झाल्या. सुरुवातीला समाधानकारक उगवण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
मात्र त्यानंतर पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने शेतजमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. परिणामी कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके कोमेजण्यास सुरुवात झाली असून, वेळेत पाऊस न झाल्यास तालुक्यावर दुबार पेरणीचे सावट गडद होण्याची चिन्हे आहेत. सध्या तालुक्यात दिवसभर कडक ऊन व उष्ण वाऱ्याचा जोर कायम आहे.
हलक्या जमिनीतील पिकांना सर्वाधिक फटका बसत असून अनेक ठिकाणी रोपे पिवळी पडू लागली आहेत. उगवलेले पीक टिकविण्यासाठी शेतकरी आकाशाकडे आशेने नजर लावून बसले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअरवेल किंवा शेततळ्याचे पाणी उपलब्ध आहे, ते तुषार अथवा ठिबक सिंचनाच्या मदतीने पिकांना जीवदान देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र पावसावरच अवलंबून असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून, पावसाचा खंड आणखी वाढल्यास दुबार पेरणीशिवाय पर्याय राहणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे.
दुबार पेरणीची वेळ आल्यास बियाणे, खत, मशागत व मजुरीचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांच्या खांद्यावर पडणार आहे. आधीच उत्पादन खर्चात वाढ झाल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक ठरणार आहे.