Jalna dams water level : तलावांनी गाठला तळ; पाणीसाठा 18 टक्क्यांवर

60 पैकी 22 लघु प्रकल्पांत ठणठणाट; जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे सावट!
Jalna dams water level
Jalna dams water levelpudhari photo
Published on
Updated on

जालना ः यंदाच्या कडक उन्हाळ्याने जालना जिल्ह्याला अक्षरशः भाजून काढले असून, आता पावसाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यातील पाणीसाठ्याची स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. जिल्ह्यातील लहान-मोठ्या 67 प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 18.17 टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील तब्बल 4 लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडेठाक पडले असून, 18 प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याच्या खाली गेला आहे. त्यामुळे आता जालनेकरांच्या नजरा वरुणराजाच्या आगमनाकडे लागून आहेत.

लघु पाटबंधारे विभाग आणि जलसंपदा विभागाच्या 4 जून 2026 च्या ताज्या अहवालानुसार, जिल्ह्यातील धरणांची स्थिती समोर आली आहे. जिल्ह्यात एकूण 7 मध्यम आणि 60 लघु प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची एकूण जलधारण क्षमता 275.93 दशलक्ष घनमीटर (दलघमी) इतकी आहे. मात्र, सध्या या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून अवघा 50.15 दलघमी (18.17 टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. वेळेवर पाऊस न पडल्यास जिल्ह्यात आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

Jalna dams water level
Nashik Dam Water Crisis| उत्तर महाराष्ट्रात भीषण पाणीबाणी! 5 लाख नागरिकांची तहान भागवण्यासाठी 226 टँकर मैदानात

लघु प्रकल्पांची स्थिती अत्यंत गंभीर

जिल्ह्यातील ग्रामीण भागाची तहान भागवणाऱ्या लघु प्रकल्पांची अवस्था सर्वाधिक बिकट आहे. 60 लघु प्रकल्पांपैकी तब्बल 4 तलावांमध्ये पाण्याचा एक थेंबही शिल्लक नाही (कोरडे तलाव). तर, 18 तलावांमधील पाणी जोत्याच्या खाली गेले आहे, जे वापरण्यायोग्य नाही. 20 तलावांमध्ये 25 टक्क्यांपेक्षा कमी, तर 17 तलावांमध्ये 25 ते 50 टक्क्यांच्या दरम्यान पाणीसाठा आहे. केवळ एकाच लघु प्रकल्पामध्ये 75 टक्क्यांपेक्षा जास्त पाणी आहे. एकूण 60 लघु प्रकल्पांत मिळून सरासरी फक्त 12.46 टक्केच (26.2 दलघमी) पाणी उरले आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या पाण्यावरच पुढील काही दिवस जिल्ह्याची तहान भागवावी लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली असून, आता सर्वांनाच दमदार मान्सूनची प्रतीक्षा आहे.

Jalna dams water level
Jalna News : जिल्ह्यातील ६७ प्रकल्पांमध्ये केवळ २९.६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा

मध्यम प्रकल्पांचाच मोठा आधार

जिल्ह्यातील 7 मध्यम प्रकल्पांनी मात्र अजूनही बऱ्यापैकी तग धरला आहे. या प्रकल्पांमध्ये 36.40 टक्के (23.95 दलघमी) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. दिलासादायक बाब म्हणजे, यातील एकही प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडलेला नाही किंवा पाणी जोत्याखाली गेलेले नाही. 3 मध्यम प्रकल्पांत 25 टक्क्यांपेक्षा कमी पाणी असून, 2 प्रकल्पांत 25 ते 50 टक्के आणि उर्वरित 2 प्रकल्पांत 50 ते 75 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक आकडेवारी एका दृष्टिक्षेपात:

एकूण प्रकल्प: 67

एकूण उपयुक्त पाणीसाठा: 18.17 टक्के

कोरडे पडलेले तलाव: 04

पाणी जोत्याखाली गेलेले तलाव: 18

25 टक्क्यांपेक्षा कमी पाणी प्रकल्प: 23

मध्यम प्रकल्पांतील साठा: 36.40 टक्के

लघु प्रकल्पांतील साठा: 12.46 टक्के

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news