जालना, पुढारी वृत्तसेवा :
भंगार घेउन जाणार्या ट्रकवर पाठीमागुन भरधाव वेगात जाणारी दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले आहेत, तर एकजण जखमी झाल्याची घटना जालना-छत्रपती संभाजी महामार्गावरील वरुडी फाटयाजवळ आज (शुक्रवार) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.
जालना-छत्रपती संभाजी महामार्गावरुन भंगार घेउन ट्रक जालन्याकडे जात होता. यावेळी या ट्रकच्या पाठीमागुन भरधाव वेगात येणारी दुचाकी (क्र.एमएच-21-9967) ही ट्रकवर पाठीमागुन धडकली. या अपघातात दुचाकीवरील शेख नाझीम शेख हमीद (वय 23), शेख कलीम शेख गुलाब नबी (21) हे देान जण ठार झाले. मुजमिल अन्सार (18) हा जखमी झाला आहे.
अपघातानंतर जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. बदनापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर. के. निकम, जमादार राठोड, पोलिस कर्मचारी दाभाडे यांनी घटनास्थळी धाव घेउन अपघातातील मृत व जखमींना बदनापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवीत वाहतूक सुरुळीत केली. बदनापूर उपजिल्हा रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मोठया संख्येने नागरीकांनी गर्दी केली हेाती. अपघात प्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.