Jalna Subsidy scam; accused arrested
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या शासनाच्या अनुदानात कोट्यवधींचा अपहार झाल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आणखी चार तलाठ्यांना अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवार दि. २३ रोजी करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आजपर्यंत या घोटाळ्यात एकूण २४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अंबड व घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुक्सान झाल्यानंतर शासनाने वेळोवेळी चार शासन निर्णय (जीआर) काढून अनुदान जाहीर केले होते. मात्र याद्या अपलोड करण्याचे काम पाहणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतजमीन नावावर नसलेल्या बोगस लाभार्थ्यांची नावे अनुदान याद्यांमध्ये समाविष्ट करून शासनाची रक्कम परस्पर परत घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठीत केली होती.
चौकशी समितीने २४० गावांमध्ये एकूण २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपये इतक्या शासकीय रकमेचा अपहार झाल्याचा अहवाल घोटाला सादर केला. त्यानुसार अंबड पोलीस ठाण्यात २२ तलाठी, तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागातील ५ कर्मचारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील १ कर्मचारी, अशा एकूण २८ आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. तपासादरम्यान विनोद जयजयराम ठाकरे (४३, रा. श्रीकृष्णनगर, अंबड रोड, जालना), कृष्णा दत्ता मुजगुले (३५, रा. ढालसखेडा, ता. अंबड), गणेश ऋषींदर मिसाळ (३४, रा. दुधनाकाळेगाव, जालना) आणि दिगंबर गंगाराम कुरेवाड (५५, रा. महालक्ष्मी रेसिडेन्सी, चौधरी नगर, जालना) यांना २३ जानेवारी रोजी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, अंबड कोर्ट २ यांच्यासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. उर्वरित फरार आरोपी व एजंटांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यांनी केली ही कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, प्रभारी पोलीस उपअधीक्षक सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिथुन घुगे व त्यांच्या पथकाने केली. या पथकात गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजू भोसले, सागर बावीस्कर, दत्ता वाघुंडे, विष्णु कोरडे (माऊली), ज्ञानेश्वर खुने, रविंद्र गायकवाड, शुभम तळेकर, श्रेयस वाघमारे, चालक पाठक मेजर, महिला अंमलदार जया निकम, निमा घनघाव व मंदा नाटकर आदींचा समावेश आहे.
सर्वांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले
आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वी २० आरोपींना अटक केली होती. दरम्यान, आरोपींनी प्रथम अंबड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात तसेच नंतर उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र तपास अधिकाऱ्यांनी सखोल तपास करून पुराव्यानिशी कागदपत्रे सादर केल्याने सर्व अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले. जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशावर तलाठ्यांनी मारलेला हा डल्ला आहे. गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार होते. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना शोधून अटक केली आहे.