

Jalna Protest over verbal abuse and obstruction of a funeral procession
जालना, पुढारी वृत्तसेवाः बदनापूर तालुक्यातील ढोकसाळ येथील कै. श्रीरंग भागुजी मांदळे यांच्या उत्तरक्रियेदरम्यान स्मशानभूमीत प्रेत अडवून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रशासकीय उदासीनतेच्या निषेधार्थ मयताचे नातेवाईक व समाज बांधवांनी सोमवारी (दि. ७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक होत 'तिरडी आंदोलन' करण्यात आले.
दरम्यान, या गंभीर प्रकरणी पवन मांदळे व भरत मगरे हे २ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र, पाच दिवस उलटूनही प्रशासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी साधी विचारपूसही केली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केलेल्या समितीने राजकीय दबावाखाली येत चुकीचा अहवाल सादर केल्याचा दावा करत, सदर समितीवर व सर्व आरोपींवर कडक कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
प्रशासनाने यावर त्वरित तोडगा न काढल्यास उद्भवणाऱ्या गंभीर परिस्थितीला पोलीस व जिल्हा प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील, असा थेट इशाराही यावेळी देण्यात आला. प्रशासनाला वारंवार निवेदन, विनंत्या करण्यात आल्या होत्या. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून आपला संताप व्यक्त केला.
अखेर, ढोकसाळ येथील स्मशानभूमीच्या जागेसंदर्भातील प्रकरण लवकरच सोडवले जाईल, अशी ग्वाही महसुल विभागाने दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी एका मुद्याच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली. यावेळी परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी लता बागूल आदींसह उपोषणकर्ते आणि समाजबांधवांची उपस्थिती होती. या आमरण उपोषणकर्त्यांची उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, गट विकास अधिकारी ज्योती राठोड यांनीही भेट दिली. यावेळी पनव मांदळे, भरत मगरे, सुभाष मांदळे, बाबासाहेब गवळी, मोकिंदा मांदळे, शरद मगरे आदींसह समाजबांधव उपस्थित होते-