

जालना : येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत 20 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांना खबऱ्या मार्फत दूधना नदी पात्रातून रात्रीच्या वेळी अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून कारवाई केली.रविवार (31) रोजी पहाटे सुमारे 1.45 वाजता इंदेवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ गोलापांगरीकडून जालन्याकडे येणारा विना क्रमांकाचा हायवा पकडला.
हायवा चालकाकडे वाळु बाबत चौकशी केली असता चालकाकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक रॉयल्टी व परवाना नसल्याचे निष्पन्न झाले नाही.याप्रकरणी चालक सतीश बाबासाहेब खिल्लारे ( रा. पिरपिंपळगाव, ता. जि. जालना) व वाहन मालक ऋषी शिवाजी काकडे (रा. ढवळेश्वर नगर, जालना) यांच्याविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळुचे हायवा फिरतांना दिसत आहेत.बहुसंख्य हायवावर नंबर नाहीत अथवा असलेले नंबर अर्धवट पुसलेले आहेत.यामुळे कारवाई दरम्यान अडचणी येतात.पोलिस व आरटीओ प्रशासनाने रस्त्यावर उतरुन नंबर नसलेल्या हायवावर कारवाई करणे गरजेचे आहे.जिल्ह्यात वाळु चोरीमुळे लाखो रुपयांचा महसुल बुडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पोलीसांनी हायवा वाहनासह 20 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी व उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वाचक पोलिस उपनिरीक्षक हरीश राठोड, पोलिस कर्मचारी चव्हा , परमेश्वर धुमाळ यांनी केली.