

Jalna News: Sixteen and a half crores plan for possible water shortage
जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना जिल्ह्यात गतवर्षी जोरदार पाऊस पडूनही एप्रिल व मे महिन्यात ५६२ गावे व १३८ वाड्यांना पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यासाठी १७७ टँकरची गरज भासणार आहे. त्यासाठी प्रशासनाच्यावतीने १६ कोटी ४९ लाख ८७ हजार रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई आराखड्यानुसार एप्रिल-मे महिन्यात जिल्ह्यात पाणी टंचाईची दाहकता वाढण्याची शक्यता आहे. ५६१ संभाव्य टंचाईग्रस्त गावे व १३८ वाड्यांसाठी १७७ टँकरची गरज भासण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील ३५३ गावांसह १०१ वाड्यांसाठी ४६२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याची वेळ येऊ शकते. १४२ गावांसह २२ वाड्यांसाठी १७७टँकरची गरज लागण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात ७२ गावांसह १३ वाड्यांतील ८४ नळयोजनांची दुरुस्ती करावी लागणार आहे.
मात्र आगामी एप्रिल-मे महिन्यात पाणीटंचाईचा प्रश्न डोके वर काढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाई निवारण्यासाठी तयारी सुरु केली आहे. यंदा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने लघु व मध्यम प्रकल्प तुडुंब भरले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट उद्भवणार नाही, अशी आशा होती.
त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जा नेवारी ते जून या कालावधीत १६ कोटी ४९ लाख ८७ हजार रुपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाणीटंचाई आराखड्यात ५६२ गावांसह १३८ वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून विहिरींचे अधिग्रहण व टँकर सुरू करण्यासाठी निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.