

Jalna News : Municipal election has been done now Mission Zilla Parishad
जालना, पुढारी वृत्तसेवा : महानगर पालिकेत भारतीय जनता पार्टीन ऐतिहासिक यश मिळविले आहे. जालना महापालिकेवर भाजपाचा एक हाती झेंडा फडकावला आहे. या यशात भाजपाचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, भाजपाचे जिल्हा महानगर अध्यक्ष भास्कर दानवे यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.
६५ जागांपैकी सुमारे ४१ जागांवर निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. महापालिका ताब्यात घेतल्यानंतर भाजपाचे आता मिशन जिल्हा परिषद सुरू झाले आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपा महायुतीत जाणार की स्वबळावर निवडणूक लढवणार हे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच कळणार आहे.
मात्र, महापालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीसाठी चिंतन मनन आणि आत्मपरीक्षणाची ठरली. सपाटून मार खाल्यानंतर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी आणखीन कोणाकोणाला पक्षात सामावून घेते, काय रणनिती अवलंबविते, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. दरम्यान, जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशानंतर भारतीय जनता पक्षाने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही स्वबळ आजमाणार असल्याचे संकेत या विजयातून मिळत आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धोबीपछाड देत स्पष्ट बहुमत मिळवले असून, या निकालामुळे भाजपाच्या राजकीय ताकदीत मोठी भर पडली आहे. महानगरपालिका निवडणुकीत ६५ पैकी ४१ जागांवर भाजपाने विजय मिळवला. या निकालाने काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची महाविकास आघाडी शहराच्या राजकारणात पूर्णतः निष्प्रभ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसने केवळ ९ जागा मिळावल्या आहेत. अनेक प्रभागांत महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले. तर काही ठिकाणी त्यांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही, यामुळे विरोधी पक्षांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत छोटे छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. बहुतांश उमेदवारांना किमान आवश्यक मतेही मिळू शकली नाहीत. परिणामी, अनेकांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यावरून मतदारांचा कल स्पष्टपणे भाजपाकडे झुकल्याचे चित्र समोर आले आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तयारीला वेग आला आहे. स्वबळावर निवडणूक लढवून जनतेचा कौल पुन्हा मिळवण्याचा पक्षाचा मानस असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील पक्षांसमोर आत्मपरीक्षणाचे आव्हान उभे राहिले आहे. संघटन मजबूत करणे, स्थानिक प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेणे आणि जनतेशी पुन्हा जोड निर्माण करणे, हे आव्हानात्मक ठरणार.