

Jalna News: Farm preparation work picks up pace; crowds gather to purchase fertilizers and seeds
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई व परिसरात पाऊस झाल्याने शेतशिवारात दिलासा मिळाला असून, खरिप हंगामाच्या तयारीसाठी मशागतीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. गेल्या पंधरवड्यापासून पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर या पावसामुळे समाधानाचे भाव उमटले आहेत.
दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास आकाश ढगाळ झाले व लगेचच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास झालेल्या या हलक्या सरींमुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. पेरणीयोग्य पाऊस नसला तरी नांगरणी, वखरणी व शेणखत टाकण्याच्या कामांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच शेतकऱ्यांसह बैलजोड्या व ट्रॅक्टर शिवारात दिसू लागले.
पिंपळगाव, रेणुकाई या भागातील शेतकऱ्यांनी मशागतीला सुरुवात केली आहे. 'पाऊस बेताचाच झाला, पण माती मऊ झाली. आता दोन दिवसांत जोरदार पाऊस आला तर तात्काळ पेरणी 'कपाशी, सोयाबीन, तूर व मूग पेरणीच्या तयारीसाठी हा पाऊस दिलासादायक आहे.
कृषी विभागानेही शेतकऱ्यांना बियाणे व खतांची जुळवाजुळव करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. हवामान खात्याने पुढील ४८ तासांत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी सज्ज झाला आहे. आता जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.