

सादिक शेख : भोकरदन तालुक्यातील आन्वा परिसरात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने खंड दिला आहे. त्यामुळे खरिपातील मका व सोयाबीन पिके करपू लागली असून, शेवटच्या घटका मोजत आहेत.
यंदा सुरुवातीपासूनच कमी-अधिक व रिमझिम पावसावर खरीप लागवड करण्यात आली. कसेबसे पिके बहरली असताना पंधरा दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने मका व सोयाबीन पिके कोमात गेली आहेत. रिमझिम पावसावर शेतात जे काही पीक तगले, ते तरी हाती येईल का? याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे खरीप हंगामातील मका पीक तुरे टाकण्याच्या अवस्थेत आहे, तर सोयाबीनचे पीक फुलोऱ्यात असतानाच संकटात सापडले आहे. त्यामुळे शेतकरी आपले पीक वाचवण्यासाठी तुषार सिंचनाची मदत घेत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, असे शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता नाही, अशा शेतकऱ्यांना मात्र पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
अनेक ठिकाणी भर पावसाळ्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाळा असूनही तुषार सिंचनाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पिकांना पाणी देत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सतत पाऊस पडत होता. परंतु इतका मोठा खंड कधीच पडलेला नव्हता. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या काहीशा पावसामुळे पिके जोमात होती. परंतु पंधरा दिवस उलटून गेले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची वाढ खुंटली असून, पिके करपू लागली आहेत. त्यामुळे वरुणराजाची कृपा न झाल्यास पिकांचे नुकसान आणि कर्जाची परतफेड, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.