

jalna farmer worried lack of rain
सुखापुरी, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडत आहे. पावसाने दडी मारल्याने शेतातील उभ्या पिकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, कष्टाने पेरलेले खरीप पिक डोळ्यांसमोर हातातून निसटण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. पिकांसाठी मशागत, बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवर हजारो रुपये खर्च करूनही निसर्गाने साथ सोडल्याने 'कष्ट आमचे, खर्च आमचा; पण पीक वाचविण्याची जबाबदारी कोणाची?' असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.
सुखापुरी महसूल मंडळासह परिसरातील गावांमध्ये कपाशी सुखापुरी महसूल मंडळासह परिसरातील गावांमध्ये कपाशी, सोयाबीन, मका, तूर आदी खरीप पिके पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. सुरुवातीच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी उरकली. त्यानंतर पिकांनीही चांगली उभारी घेतली. मात्र, आता पावसाने मोठा खंड दिल्याने जमिनीतील ओलावा कमी होत चालला आहे. पिकांची पाने कोमेजत असून, आणखी काही दिवस पाऊस लांबला तर उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पावसाअभावी शेतकरी संकटात असताना शासनाच्या मदतीकडे त्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, मदत कधी मिळणार, पीक नुकसान कसे ठरणार आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात किती मदत पोहोचणार, याबाबत अद्याप संभ्रम आहे. नुकसान झाल्यानंतर पंचनामे, अहवाल आणि कागदोपत्री कारभार सुरू होण्यापूर्वीच पिके हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
शासनाच्या संवेदनशीलतेचा प्रश्न
पाऊस नाही म्हणून आभाळाकडे तर कर्जमाफी नाही म्हणून सरकारकडे पाहतोय. दोन्हीकडून दिलासा मिळाला नाही, तर उद्याचा शेतकरी कोणत्या आधारावर उभा राहणार ? हा प्रश्न आता केवळ शेतकऱ्यांचा नसून शासनाच्या संवेदनशीलतेची कसोटी ठरणारा आहे.