

Grants worth ₹2.10 crore for 34 Shivbhojan centers in the district are pending
संघपाल वाहुळकर
जालना : गरिबांना अवघ्या १० रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध करून देणाऱ्या 'शिवभोजन थाळी' योजनेला जालना जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असला, तरी या योजनेचे केंद्रचालक मात्र आर्थिक संकटात सापडले आहेत. एकीकडे गरिबांची भूक भागविण्यासाठी शिवभोजन केंद्रे सुरू आहेत; मात्र दुसरीकडे शासनाचे अनुदान रखडल्याने केंद्रचालकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. थकीत अनुदान तातडीने अदा करून केंद्रचालकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यातील ३४ शिवभोजन केंद्रांवरून दररोज सुमारे तीन हजार नागरिकांना भोजन दिले जात आहे. मात्र, केंद्रचालकांना शासनाकडून मिळणारे अनुदान रखडले असून, तब्बल दोन कोटी १० लाख रुपयांचे अनुदान थकीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे गरिबांची भूक भागविणाऱ्या केंद्रचालकांवरच आर्थिक संकटाची वेळ आली आहे.
राज्य शासनाने गरीब व गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी २६ जानेवारी २०२० पासून 'शिवभोजन थाळी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत नागरिकांना अवघ्या १० रुपयांत दोन पोळ्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण आणि एक वाटी भात दिला जातो. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिवभोजन केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध असते.
जिल्ह्यात या योजनेअंतर्गत एकूण ३४ केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. सध्या ही सर्व केंद्र सुरू असून, त्यामधून दररोज सुमारे तीन हजार नागरिकांना भोजनाचा लाभ मिळत आहे. मात्र, शासनाकडून केंद्रचालकांना मिळणारे अनुदान वेळेवर प्राप्त होत नसल्याने त्यांना केंद्राचा खर्च भागविण्यासाठी पदरमोड करावी लागत आहे.
शिवभोजन थाळी उपलब्ध करून देणाऱ्या केंद्रचालकांना शासनाकडून प्रतिथाळी अनुदान दिले जाते. ग्रामीण भागातील केंद्रांना प्रति थाळी २५ रुपये, तर शहरी भागातील केंद्रांना प्रति थाळी ३५ रुपये अनुदान मिळते. मात्र, मार्च महिन्यापासून देयके रखडल्याने केंद्रचालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांचे सुमारे दोन कोटी रुपयांचे अनुदान थकीत असल्याची माहिती केंद्रचालकांकडून देण्यात आली.
दहा रुपयांत पोटभर जेवण
शिवभोजन थाळीत दोन पोळ्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण आणि एक वाटी भात दिला जातो. या थाळीसाठी लाभार्थ्याकडून केवळ १० रुपये घेतले जातात. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या तसेच गरीब व गरजू नागरिकांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे.